Skip to main content

Translate

चला भारतीय संविधान समजून घेवूया

*चला भारतीय संविधान समजून घेवूया!*

       संविधान उद्देशिका, पार्श्वभूमी व संविधान जागृतीसाठी सदर लेख आहे. आज देशात 72 वर्षानंतर ही संविधान बाबत जागृती पाहिजे त्याप्रमाणे झालेली नाही,असे वाटते. संविधान काहींनी  डोळ्यांनी पाहिलेही असेलही. ज्यांनी पाहिले त्यांनी त्यास स्पर्श केलेला असेल.ज्यांनी स्पर्श केला त्यांनी ते वाचले, समजून घेतले का ? याबाबत खात्री देता येत नाही! संविधानाचा अभ्यास करून ते जगण्यात अंमल करणारे यांची संख्या निवडकच आहे. कारण वेगवेगळ्या जाती,धर्माची माणसे त्यांच्या धार्मिक ग्रंथ यांना पूजते! 
परंतु सर्व जाती,धर्म,भाषा,पंथ यांना देशाचा एकमेव ग्रंथ आचारनिय आहे,तो आहे *संविधान*. हे संविधान देशांतील सर्वात लहान संस्था गावपातळीवरील *ग्रामपंचायत* ते देशाची सर्वोच्च संस्था *संसद* , न्यायपालिका, प्रसारमाध्यमे यांच्यासह व्यक्तीच्या जीवनाला सविस्तर मार्गदर्शन करते. ज्या बंधू बहिणी यांनी संविधान वाचलं, समजलं ,अंगिकारले ते प्रगतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे माझी विनंती असेल की सर्वांनी निरपेक्ष भावनेने एकदा *संविधान*उद्देशिका* पहावं ,वाचावं ,समजून घ्यावं. कारण हे सर्व भारतीयांसाठी आहे. संविधान आहे म्हणून देश आहे. कारण इंग्रजांची गुलामी आणि त्यापूर्वी असलेली राजेशाही किंवा पेशवाई चा इतिहास पाहिल्यास आपणास स्वातंत्र्य समजेल!
 हे सर्व महापुरुषांचा संघर्ष ,त्याग आणि खडतर परिश्रमाने मिळाले आहे.
भारतीय संविधान तयार झाले त्यावेळी 395 कलमे,8 परिशिष्टे जे 22 भाग आणि 12 अनुसुची आहेत.
--------------------------- 
*1.पार्श्वभूमी:-*
भारतीय संविधान हे जगातील आदर्श असे संविधान आहे.भारताचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा यांचा विकासक्रम ,त्यातून आलेले सम्यक विचार तसेच जगातील विविध देशातील संविधानिक तरतुदी यांचा अभ्यास करून योग्य त्या तरतुदीचा मेळ घालण्यात आलेला आहे.
16 मार्च 1946 ला 
'कॅबिनेट मिशन' सत्ता हस्तांतरण योजना घोषित केली. स्वतंत्र भारताला आपला कारभार चालविण्यासाठी संविधान असणे गरजेचे होते.त्यासाठी संविधान निर्मिती साठी 'संविधानसभा' गठीत करणे आवश्यक होते.यानुसार निवडणुका झाल्या ज्यात प्रांतीय विधानमंडळ सदस्यांनी प्रतिनिधी निवडले.29 राज्यांचे,93 संस्थानाचे प्रतिनिधी होते. काँग्रेसच्या विरोधामुळे डॉ आंबेडकर
मुंबई विधानमंडळ यातून निवडले गेले नाही. त्यामुळे त्यांना बंगाल विधानमंडळ येथून निवडले.(जोगेंद्रनाथ मंडल यांनी त्यासाठी राजीनामा दिला)
संविधान निर्मिती कार्याचा प्रारंभ संविधान सभेने 9 डिसेंबर 1946 रोजी केला.ही बैठक नवी दिल्ली येथे झाली.यावेळी 296 पैकी 207 सदस्य उपस्थित होते.यावेळी हंगामी अध्यक्ष डॉ सचिदानंद सिन्हा निवड केली.तर दुसऱ्या दिवशी संविधान सभेने घटनासमितीचे अध्यक्ष म्हणून डॉ राजेंद्र प्रसाद यांची निवड केली. त्यानुसार 11 डिसेंबर पासून त्यांनी कार्यभार पाहिला.लागलीच 13 डिसेंबर ला बैठक झाली.त्यात जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेचे ध्येय व उद्दीष्टे स्पष्ट करणारा ठराव मांडला.यावर पुरुषोत्तम टंडन आणि डॉ राजेंद्र प्रसाद यांची भाषणे झाली.पुन्हा 16 तारखेला बैठक झाली त्यात कायदेपंडित डॉ एम आर जयकर यांनी उपसूचना मांडल्या. यावर वल्लभभाई पटेल,मिनू मासानी यांनी टीका केली. दुसऱ्या दिवशी डॉ राजेंद्र प्रसाद यांनी डॉ आंबेडकर यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी सांगितले. यावेळी त्यांच्या भाषणाने संपूर्ण सभागृहात चैतन्य निर्माण झाले. प्रस्तावातील मुद्द्यावर त्यांनी निवेदन केले.20 जानेवारी 1947 ला सुधारणासह प्रस्ताव संमत केला. 24 जानेवारी ला प्रस्तावानुसार "संविधान सल्लागार समिती "स्थापन केली, याचे अध्यक्ष सरदार पटेल होते. या समितीत 50 सदस्य होते. या समितीने 4 उपसमित्या नियुक्त केल्या.
1.मूलभूत अधिकार समिती,
2.अल्पसंख्याक उपसमिती,
3.उत्तर पूर्व अदिवासी सीमा प्रदेश उपसमिती
4.वगळलेल्या आणि अंशतः वगळलेल्या प्रदेशासाठी उपसमिती

त्याचबरोबर 30 एप्रिल 1947 च्या प्रस्तावानुसार पुन्हा तीन समित्या नियुक्त करण्यात आल्या. 
1.संघअधिकार समिती,
2.संघ संविधान समिती यांचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरु, 3.प्रांतीय संविधान समिती अध्यक्ष सरदार पटेल होते.यापैकी 3 समित्यांचे सदस्य म्हणून डॉ आंबेडकर होते.दरम्यान बंगालची फाळणी झाली त्यामुळे डॉ आंबेडकर संविधान सभेचे सदस्य राहिले नाही. त्यावेळी त्यांच्या संविधान सभेतील कामावर प्रभावित  होवून डॉ राजेंद्र प्रसाद यांनी मुंबई चे मुख्यमंत्री बी जी खेर यांना 30 जून 1947 ला पत्र पाठवून डॉ आंबेडकर यांची निवड करावी, असे सुचविले. त्यानुसार जुलै 1947 ला कार्य सुरू झाले.15 ऑगस्ट 1947 या प्रधानमंत्री नेहरूंनी त्यांना केंद्रीय मंत्रि  मंडळात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.कायदेमंत्री म्हणून जबाबदारी दिली.
------------------------------------
*मसुदा समिती*  
29 ऑगस्ट 1947 रोजी संविधान सभेने मसुदा समिती निवडली.यात
1.अल्लादि कृष्णस्वामी अय्यर
2.एन गोपालस्वामी अय्यंगार
3.डॉ बी आर आंबेडकर
4.के एम मुन्शी
5.सय्यद मोहम्मद सदुल्लाह
6.बी एल मित्तर
7.डी पी खेतान
एकमताने मसुदा समितीचे  अध्यक्ष म्हणून डॉ आंबेडकर यांची निवड केली..या समितीवर संविधानाचा मसुदा आलेखित करण्याची जबाबदारी होती.
मसुदा समितीची पहिली बैठक 30 ऑगस्ट 1947 झाली.13 फेब्रुवारी 1948 पर्यंत मसुदा समितीच्या 44 बैठका झाल्या.त्यात संविधानसभा सल्लागार कार्यालयाने प्रस्तावित मसुद्याच्या प्रत्येक अनुच्छेदाचा विचार,उजळणी आणि पुनर्लेखन केले. 
21 फेब्रुवारी 1948 ला 18 भाग,315 कलमे आणि 9 परिशिष्टे असणारा मसुदा संविधान सभा अध्यक्ष यांना सादर केला.तो 3 नोव्हेंबर 1948 आठ महिने लोकांना चर्चेसाठी उपलब्ध होता.
      *प्रथम वाचन*:-
4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 1948 संविधान सभागृह नवी दिल्ली येथे प्रथम वाचन झाले.यात प्रश्न उत्तरे, संक्षिप्त चर्चा झाली.
          *दुसरे वाचन*:-15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 याकाळात संविधानाचे दुसरे वाचन करवून घेण्यात आले.यात प्रत्येक अनुच्छेद यावर क्रमवार सविस्तर चर्चा झाली.डॉ आंबेडकर कलम मांडीत त्यावरील चर्चेला उत्तरे देत. योग्य दुरुस्त्या करण्यात आल्या. 
          *तिसरे वाचन*:- 14 नोव्हेंबर 1949 ते 25 नोव्हेंबर 1949 यात सभासदांनी आप आपली मते मांडली.चर्चा झाली. कलमांना 7635 दुरुस्त्या सुचविण्यात आल्या.त्यापैकी योग्य त्या 2473 दुरुस्त्या मंजूर करण्यात आल्या.
25 नोव्हेंबर 1949 ला डॉ आंबेडकर यांनी संविधान तयार करण्याबाबतचा तपशील दिला. त्याच बरोबर एक भाषणं दिले..त्यात, म्हणाले,
"ही घटना बरी असो वाईट, ती राबवनाऱ्यावर बरीवाईट ठरणार आहे..."
दि.26 जानेवारी 1950 रोजी राजकीय जीवनात समता येईल,पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील.ही विसंगती जर आपण लवकर दूर केली नाही तर आपण महत्प्रयासाने बांधलेला राजकीय इमला, विषमतेची झळ पोचलेला वर्ग उध्वस्त केल्यावाचून राहणार नाही."
   संविधान सभेचे कार्ये दोन वर्षे अकरा महिने आणि सतरा दिवस चालले.यात संविधान सभेची 11 सत्रे, 165 बैठका,तर 63,96,729 रुपये खर्च झाला. संविधान निर्माण प्रक्रियेचे 53000 दर्शकांनी अवलोकन केले. संविधानात 395 कलमे व 8 परिशिष्टे मंजूर करण्यात आली.संविधानाच्या तीन प्रती सभेच्या पटलावर ठेवल्या.इंग्रजी छापील प्रत,एक हिंदी हस्तलिखित प्रत .एक प्रत कलाकारांच्या भिन्नकृतीची सजविलेली होती.तिन्ही प्रतीवर अध्यक्ष, सदस्यांनी सहया केल्या.
26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकार करून 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानाचा अंमल करण्यात आलेला आहे.
------------------------------------
*संविधानाची प्रास्ताविका*
ही प्रास्ताविका दररोज शाळेत परिपठात घेण्यात येते.तसेच शालेय पातळीवरील सर्व पुस्तकाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत, प्रतिज्ञा आणि प्रास्ताविका छापलेली आहे.जर आपण डोळसपणे ही प्रास्तविका वाचली समजून घेतली तर आपल्या लक्षात येईल की त्यात दिलेले मूल्ये खूप महत्त्वाचे आहेत.
पहिल्या ओळीची सुरुवात पाहिली तर
       आम्ही भारताचे लोक *we are the people of India* सुरुवात करण्या बाबत वेगवेगळ्या सूचना आल्या होत्या, त्यावर प्रश्न उत्तरे ,चर्चा ,शंका समाधान यातून योग्य सुरुवात केली आहे. हे याठिकाणी ही महत्त्वाची बाब आहे की, हे संविधान लोकांनाच स्वतः प्रत अर्पण करण्यात आले आहे. 
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत खालील तत्वे समाविष्ट आहेत.
*१.सार्वभौम*- 
बाह्य व अंतर्गत (राजेशाही,हुकूमशाही) अशा दोन्ही नियंत्रणातून भारत मुक्त असेल.नियंत्रण लोकानी निवडलेले सरकारचे असेल.
*२.समाजवादी*- 
देशातील संपत्तीचे न्याय वाटप असावे.सरकारी मालकीचे उद्योग असलेली मिश्र अर्थव्यवस्था असेल. वंचितांना,कामगार, कष्टकरी यांना हितकारक आणि आर्थिक विषमता कमी करणारे कायदे केले जातील.
*३.धर्मनिरपेक्ष* 
सरकारचा अधिकृत असा धर्म नसेल.व्यक्तीला धर्मस्वातंत्र्य आहे.धर्माला स्वातंत्र्य नाही.व्यक्ती आपल्या स्वतःचा धर्म अनुसरण करू शकेल. तसेच इतर धर्म ही स्वीकारू शकेल.सर्व धर्मीय आपल्या धर्मानुसार ठराविक मर्यादेत आचरण करू शकतात.यासाठी आर्टिकल 25, 26, 27 आणि 28 नमूद आहेत.बरेच शासकीय संस्थामध्ये अधिकारी/कर्मचारी अज्ञान किंवा समज नसल्याने धार्मिक विधी,कर्मकांड करतात,जे चुकीचे आहे.
*४.लोकशाही**:- 
भारतात लोकशाही शासनप्रणाली आहे. लोकशाही म्हणजे काय म्हटले की,अब्राहम लिंकनची व्याख्या आठवते.परंतु डॉ आंबेडकर लोकशाहीची व्याख्या करतांना म्हणतात,
"लोकांच्या सामाजिक, आर्थिक जीवनात रक्ताचा थेंबही न सांडता क्रांतिकारी परिवर्तन आणता येईल, अशी शासन प्रणाली म्हणजे लोकशाही होय". 
देशातील कोणत्याही 18 वर्षे पूर्ण असणाऱ्या व्यक्तीला 1 मत ,एक मूल्य हा दर्जा दिला आहे.
सोबतच जॉन स्टुअर्ट मिल चा संदेश महत्वपूर्ण आहे,
    *"लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये.तसेच त्याच्यावर इतकाही विश्वास ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकाराचा तो लोकांच्या संस्था उध्वस्त करण्यासाठी उपयोग करील.संपूर्ण आयुष्य देश सेवेसाठी व्यतीत केलेल्या महापुरुषांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही,परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत".*
५.*गणराज्य* :-
सर्व सत्ता जनतेच्या हाती असेल. वंशपरंपरागत राजा नसलेली सार्वत्रिक मतदानाची पद्धती म्हणजे गणराज्य .
      तर खालील *मूल्ये* संविधानात समाविष्ट आहेत, ते समजून घेवूया!
*.न्याय :-*
[A]सामाजिक न्याय :-
मागास जाती आदिवासी स्त्रिया हे घटक सामाजिक व सांस्कृतिक रचनेमुळे इतरांच्या तुलनेत मागास राहिले अशांसाठी खास सवलती व अन्य तरतुदी करणे.
[B] आर्थिक न्याय:-  आर्थिक व भौतिक प्रगतीच्या संधी सर्वांना न्यायपूर्ण मिळणे आवश्यक आहे.यासाठी योग्य कामगार कायदे  स्वयंरोजगाराच्या,शेती,इतर व्यवसाय व अन्य उपजीविकेची साधने नियोजन पूर्वक अमलात आणली पाहिजेत.
[C ]राजकीय न्याय :-
धर्म,जात,भाषा,प्रांत,पैसा कोणताही भेदभाव न करता राजकीय तरतुदीचा अधिकार मिळेल. प्रतिनिधित्व, निवडणुका लढवता येतील.
*स्वातंत्र्य* :-
विचार,अभिव्यक्ती, विश्वास,श्रद्धा,
उपासना यांचे स्वातंत्र्य अभिप्रेत आहे.
आपले म्हणणे भाषण, लेखन,कला  मार्फत व्यक्त करण्याची मोकळीक आहे. विरोधी मताचा आदर करणे ,न पटणाऱ्या मतांचा आपले म्हणणे मांडून पटवून देणे.
**बंधुता*- 
आपण दररोज सकाळी प्रतिज्ञा म्हटलो आहोत.त्यात देशातील सारे भारतीय बांधव आहेत,असे म्हटलो आहोत.म्हणजेच आमचा व्यवहार आचरण हे बंधुतेचे असावे.
         प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र आहे.तिचा दर्जा आहे,तिला सन्मान आहे.तो जपणे गरजेचे आहे.संविधानाने व्यक्ती म्हणून दर्जा दिलेला आहे.तसेच त्यानुसार तिला योग्य ती संधी मिळायला हवी. तसेच राष्ट्र म्हणून एकता आणि एकात्मता जपली जाणे आवश्यक आहे.
ही मूल्ये आपण सर्वजन स्वतः आचरणात आणून ती प्रवर्धित करण्याचा  संकल्प करून निर्धारीत करत आहोत. ही मूल्ये खरोखरच आम्ही पहिलीत का कधी? काय आमचे वर्तन असे आहे काय? याचा विचार करून योग्य तो  वर्तनबदल करावा.
--------------------------------
काही निवडक बाबीविषयी बोलूया 
संविधानाने व्यक्तीला जसे मूलभूत हक्क अधिकार दिले आहेत तसेच मूलभूत कर्तव्ये ही अपेक्षित आहेत. 1976 ला 42व्या घटनादुरुस्ती ने भाग 4 A कलम 51 A ने ते समावेश केलेला आहे. ही 1ते11 कर्तव्ये पालन करावीत.
संविधानाने भाग तीन मध्ये 
मूलभूत हक्क समाविष्ट केले आहेत.ते पुढीलप्रमाणे आहेत.
#कलम 14 ते 18 समानतेचा हक्क. 
#कलम 19 ते 22 स्वातंत्र्याचा हक्क.
#कलम 23 ते 24 शोषणाविरुद्ध हक्क.
#कलम 25 ते 28 धर्मस्वातंत्र्याचा हक्क.
कलम 29 ते 31 सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क.
#कलम 32 ते 35 संविधानिक उपाय योजण्याचा हक्क. -----------------------------------
या लेखाच्या निमित्ताने सर्व बंधू बहिणी यांना विनंती की संविधान साक्षर होवून त्याच्या प्रचार प्रसारासाठी सहभागी व्हावे.!
जय संविधान जय भारत.

Comments